नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या माध्यमातून कट कारस्थान रचण्यात येत आहे – नवाब मलिक

मुंबई : ७ सप्टेंबर – ‘भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, हे नियोजित कट कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
‘नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या माध्यमातून कट कारस्थान रचण्यात येत आहे. सरकारवर जे आयएएस, आयपीएस अधिकारी आरोप करत आहेत त्यांची आधी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली आहे. त्यांच्या भेटी आम्ही वेळोवेळी उघड करु, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, केंद्रातील मंत्र्यांसोबतही बैठक झाल्यानंतर सरकारवर आरोप करण्याची सुरुवात झालीये,’ असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
‘देशातील संस्था, एजन्सी याचा राजकीय वापर होतो हे आता लपून राहिलं नाही. ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर आता कोर्टानंही प्रश्न उपस्थित केले आहेत. जितक्या ताकदीने आम्हाला बदनाम करण्याचं प्रयत्न करत आहेत, त्याला जनताच उत्तर देईल. पश्चिम बंगलामध्ये तृणमूलच्या नेत्यांना हैराण करण्यात येत आहे,’ असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
‘भाजपचे केंद्रातील सरकार जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे. तिथे सरकारला बदनाम करण्यासाठी, त्या सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहेत. अनिल देशमुख, भावना गवळी, अनिल परब आणि संजय राऊत असतील या सर्वांना राजकीय हेतूने टार्गेट करण्यात येत आहे,’ असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Leave a Reply