राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबद महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : २ सप्टेंबर – विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले होते. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे, या भेटीनंतर तरी तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली होती. ८ महिने होऊनही अद्याप राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून करण्यात आली.
” १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती केली आहे. अपेक्षा आहे की ते लवकर निर्णय घेतील.”, असं काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. दुसरीकडे “राज्यपालांना राज्यात काय सुरू आहे त्याची माहिती दिली जाते, तर सध्या पावसाबद्दल, धरण स्थिती बद्दल माहिती दिली, चर्चा केली. शिफारस केलेल्या १२ नावांबद्दल निर्णय घ्यावा अशी विनंती केली”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
६ नोव्हेंबर २०२० ला नवाब मलिक, अनिल परब आणि अमित देशमुख यांनी १२ नावे राज्यपाल यांना भेटून सुपूर्त केली होती. तर त्याच्या दोन आठवडे आधी २९ ऑक्टोबर २०२० ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ नावे मंजूर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली होती.

Leave a Reply