३० लाखांच्या खंडणीसाठी केले स्वतःच्याच मैत्रिणीचे अपहरण

नागपूर : ७ ऑगस्ट – तब्बल ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी स्वत:च्या मैत्रिणीचे अपहरण केल्यानंतर पोलीस कारवाईच्या भीतीने काही तासांतच तरुणीची सुटका केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. ऋषिकेश किशोर पोरखे (वय २१) आणि चिकू भाऊराव चव्हाण (वय २१ रा. दोन्ही रा. चंदननगर) अशी या आरोपींची नावे असून वैष्णवी मूलचंद देवतळे (वय १९, रा. चंदननगर) असे अपहृत तरुणीचे नाव आहे. ऋषीकेश आणि वैष्णवी हे दोघे परीचित असून मित्र असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
वैष्णवी सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीटची तयारी करीत आहे. तिचे वडील कळमना बाजारात भाजीचे मोठे व्यापारी आहेत. ऋषिकेशच्या वडिलांचे हॉटेल आहे. तो या हॉटेलमध्येच काम करतो. वैष्णवी आणि ऋषिकेशची ओळख असून दोघेही चांगले मित्र आहेत. आज सकाळी ६ वाजता ती पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेली असता ऋषिकेश व त्याच्या मित्राने तिला पाठिमागून पकडले व तोंड बांधून एका कारमध्ये डांबले. त्यानंतर तिला जवळपास दोन तास शहरात फिरवले. दरम्यान तिच्या वडिलांना मोबाइलवर कॉल करून ३० लाख रुपयांची खंडणी त्यांनी मागितली. खंडणी न दिल्यास मुलीला संपवण्याची धमकी दिली.
देवतळेंनी तातडीने इमामवाडा पोलीस ठाणे गाठले व याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपी घाबरले. त्यांनी वैष्णवीला सोडून दिले. दरम्यान, वैष्णवीने सक्करदरा भाजी बाजारातील एका भाजी विक्रेत्याकडून मोबाइल घेऊन वडिलांना फोन केला. त्यानंतर वडील तसेच पोलीसही तिथे पोहचले. पुढे काही वेळातच मोठा ताजबाग परिसरातून दोन्ही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली.
वैष्णवीसोबत आपली अनेक वर्षांपासून मैत्री असून तिच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यामुळे त्यांना घाबरवण्यासाठी हा कट रचला व मुलीच्या अपहरणाचे नाटक केले. आपण, तिला फिरायला घेऊन गेलो होतो. तिला परत सोडून देत असताना घरी पोलीस आल्याचे समजले. म्हणून सक्करदरा परिसरात तिला सोडले व पळून गेलो. तिच्या वडिलांना घाबरवण्यासाठी खंडणी कॉल केला होता, अशी कबुली आरोपी ऋषिकेशने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply