अनिल देशमुखांच्या याचिकेवर शुक्रवारी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : २७ जुलै – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याचिकेची प्रत केंद्र सरकराला देण्याचे निर्देश कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. सक्तवसुली संचलनालय (ईडी) यांनी दिलेल्या समन्सला महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
ईडीने अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे. या संबंधी त्यांना ईडीने तीन समन्स बजावले आहेत. त्यानंतर देशमुख पिता – पुत्राने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. देशमुख पिता-पुत्राविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यावर स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावून ५ जुलै रोजी चौकशीला हजर राहाण्यास सांगितले होते. ईडीकडून आतापर्यंत तीन समन्स बजावण्यात आले आहेत. पहिल्या दोन समन्सला ते ईडीसमोर हजर झाले नाही. देशमुखांनी ईडीला पत्र लिहून सांगितले होते, की त्यांचे वय ७२ वर्षे असून ते अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत. कोरोनामुळे त्यांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या चौकशीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची विनंती केली होती. मात्र ईडीने त्यांची मागणी नाकारत त्यांना तिसरा समन्स बजावून ५ जुलै रोजी चौकशीला बोलावले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातच देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश याला ६ जुलै रोजी चौकशीला बोलावले होते.
ईडीने काही दिवसांपूर्वीच देशमुख यांच्या नागपूर आणि मुबंई येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांची चौकशी ईडी करत आहे. देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे.

Leave a Reply