पुन्हा मुसळधार ! महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना गंभीर इशारा

मुंबई: २४ जुलै- राज्यात कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात नाही. अशात हवामान खात्याने पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सहा जिल्ह्यांना गंभीर इशारा दिला आहे. यामुळे राज्यासमोरील संकट वाढल्याचं दिसत आहे.
कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड, सिंधुदुर्ग ठणे पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढचे दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहे.
मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याचा परिसर, सातारा, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच २७ जुलैपर्यंत मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply