मूल वनपरिक्षेत्रात कृत्रिमरीत्या अजगराची अंडी उबवून चार पिल्लांचा जन्म

चंद्रपूर : २३ जुलै – कृत्रीमरित्या अजगराची अंडी उबवून चार पिल्लांचा जन्म झाल्याची घटना मूल वनपरिक्षेत्रात पहिल्यांदाच घडली आहे. या पिल्लांना प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ५२२ मधील एका नाल्याच्या शेजारी सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहे. वनविभाग आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य या पिल्लांवर लक्ष ठेवून आहेत.
चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंडयासोबत आढळले. ही माहिती संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे व सदस्यांनी क्षेत्र सहायक पी. डी. खनके व वनरक्षक सुभाष मरस्कोल्हे यांना दिली. लगेच वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी चौखुंडे यांना अजगराला अंड्यातून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली. पण भीतीपोटी त्यांनी अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली. घटनेची माहिती चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी सारीका जगताप, सहायक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देण्यात आली. त्यानंतर क्षेत्र सहायक पी. डी. खनके, वनरक्षक सुभाष मरसस्कोले यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मृत्यारपवार, तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे, स्वप्नील आक्केवार, प्रशांत केदार, अंकुश वानी, दिनेश खेवले यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडले व अजगराचे अंडे ताब्यात घेतले.
या अजगराला वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांच्या उपस्थितीत कक्ष क्रमांक 751 मध्ये निसर्गमुक्त केले. अजगराच्या अंड्याला वनधिकार्यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दीड महिना या अंड्याची योग्य काळजी घेतल्यानंतर 15 ते 16 अंड्यातून अजगराची चार पिल्ले बाहेर निघाली.

Leave a Reply