शिवाजीराव आढळराव पाटील यांची अमोल कोल्हेंवर जहरी टीका

आंबेगाव : १८ जुलै – पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला. आता शिवसेनेवर टीका करत आहे, अशी खोचक टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही टीका केली. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला. आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय?, असा सवाल आढळराव पाटील यांनी केला आहे.
अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहे. मी म्हातारा असलो तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राटासारखा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाद सुरू आहे. हा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. हा वाद एवढा शिगेला पोहचलाय की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं. त्यामुळे आता या दोघांमधला वाद सरकारवर परिणाम करतो का याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे.

Leave a Reply