पंजाबच्या राजकारणात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ढवळाढवळ करू नये, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे थेट सोनियांना पत्र

चंदीगड:१७ जुलै- पंजाब काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. पक्षश्रेष्ठीनी पंजाब सरकार आणि राजकारणात जबरदस्ती ढवळाढवळ करू नये. पंजाबमधील परिस्थिती त्यासाठी अनुकूल नाही. यामुळे पक्षाला आणि सरकारलाही मोठी किंमत चुकवावी लागेल. हे पक्षाने समजून घ्यावं, असं अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुका जवळ येत असताना दुसरीकडे पंजाब काँग्रेसमधील संघर्ष थांबण्याची चिन्हं नाहीत. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचे गट आमनेसामने ठाकले आहेत. हा वाद सोडवण्यासाठी काँग्रेसकडून चर्चा आणि भेटीगाठी सुरूच असून, आता नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून पंजाब काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात होत असलेला हस्तक्षेप थांबवण्याची विनंती केली आहे. पक्षाने पंजाबमधील परिस्थिती समजून घ्यावी, अन्यथा सरकार व पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply