पोलीस मारहाणीत झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे मुनगंटीवारांना आश्वासन

चंद्रपूर : १६ जुलै – राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील अनिल मडावी यांचा पोलिस कोठडीत असताना पोलिसांच्या मारहारणीमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या मागणीसाठी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत त्यांनी शिष्टमंडळासह निवेदन सादर केले. यादरम्यान आ. मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन आ.मुनगंटीवार यांना दिले.
यावेळी पोलिस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेत आ. मुनगंटीवार म्हणाले, अनिल मडावी यांच्या आई विमल मडावी यांनी यासंदर्भात आपणाकडे तक्रार केली आहे. मृतक अनिल मडावी यांचे पार्थिव अजूनही जिल्हा सामान्य रूग्णालयातील शवगृहात ठेवले आहे. हा मृत्यू पोलिस कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे. या प्रकरणाची एकूणच सखोल चौकशी करून मडावी कुटूंबियांना न्याय मिळण्याची आवश्यकता आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले. निवेदन देणार्या शिष्टमंडळात चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्यक्ष रामपाल सिंह, मनपा स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, महानगर अनुसूचित जमाती अध्यक्ष घनराज कोवे, वाघू गेडाम आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply