मला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली – भास्कर जाधव यांचा आरोप

मुंबई : ६ जुलै – पावसाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले आहे. दोन दिवसीय अधिवेशन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष बनून चांगलेच गाजवले. ‘भाजपवर जी काही परिस्थिती ओढावली आहे, ती त्यांना टाळता आली असती. मुळात देवेंद्र फडणवीस सभागृहात एक बोलतात आणि बाहेर एक बोलतात’ असं म्हणत जाधव यांनी पहिल्यांदाच विधानभवनाबाहेर प्रतिक्रिया दिली.
भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा सभागृहात घडललेल्या घटनेबद्दल माहिती दिली. तसंच, मला दुसऱ्या दिवशी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली, असा दावा जाधव यांनी केली.
‘भाजपवर जी काही परिस्थिती ओढावली आहे, ती त्यांना टाळता आली असती. मुळात टाळी कधी एका हाताने वाजत नाही. माझ्याशी वाद घालण्याचं काहीच कारण नव्हते. सरकारसोबत वाद घालायला पाहिजे होता. आपण काही गोष्टी सोईस्करपणे विसरतो. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल ठराव मांडला होता. त्यांनी ठराव मांडल्यानंतर त्यांना काही सुचना द्यायच्या असतील, काही हरकत घ्यायची असेल तर त्यांनी बोललं पाहिजे. पण, फडणवीस यांचं अधिवेशनाच्या सुरुवातीपासून काय बिनसलं होतं हे काही कळायला मार्ग नाही, असा टोला जाधव यांनी फडणवीसांना लगावला.
फडणवीस अधिवेशनात अशा पद्धतीने आक्रमक झाले होते की, ते कुणालाच बोलू देत नव्हते. मंत्री काय बोलत आहे हे मला माहिती आहे अशा अविर्भावात ते बोलत होते, हे कोणत्या संसदीय कामकाजात बसते. भुजबळ यांनी शांतपणे आणि पुराव्यानिशी उत्तरं दिली होती. सर्व सदस्यांनी शांतपणे ऐकून घेतले होते. पण फडणवीस हे काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हते, असंही जाधव म्हणाले.
‘भाजपच्या आमदारांना मी शिवीगाळ केली असा आरोप फडणवीस करत आहे. पण, ते काय आरोप करता हे यापेक्षा ते सभागृहात काय बोलतात हे महत्त्वाचं आहे. सभागृहात त्यांनी आमचे दोन-चार लोकं हे चुकीचे बोलले होते. याबद्दल भास्कररावांची माफी मागितली होती, असं फडणवीस सभागृहात बोलले होते. आता ते सभागृहात एक बोलता आणि बाहेर वेगळंच बोलतात, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

Leave a Reply