विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले जीवदान

वाशीम : २७ मे – मानोरा तालुक्यातील ग्राम वटफळ येथील शेतकरी गजानन घोरसडे यांच्या शेतात आज वन्य प्राणी बिबट्या तहान भागवण्यासाठी पडल्याने ग्रामस्थ आणि वन कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला जीवदान दिले. मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या आणि वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दुरुस्त ग्राम वटफळ जंगल परिसरात वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यक सोय केलेली नसल्यामुळे वन्य प्राणी आपली तृष्णा भागविण्यासाठी जीव धोक्यात घालून वस्तीकडे पलायन करण्यास बाध्य झाले आहे.
विदर्भामध्ये सध्या प्रचंड उष्मा असून सूर्य आग ओकत असल्यामुळे जंगल परिसरामध्ये पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे वन्य प्राणी आपली तहान भागविण्यासाठी मिळेल तिकडे विहिरी, तलाव, धरणे यातील पाणी पिण्यासाठी जीवाची बाजी लावताना सदरील घटनेवरून निदर्शनास येत आहे.
वटफळ येथील शेतकरी गजानन गुरसाळे यांच्या जंगल परिसराला लागून असलेल्या विहिरीत आज दुपारी बिबट पडल्याची माहिती वनकर्मचारी वायकर मॅडम यांना कळताच वनविभागाच्या रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून या बिबट्याला सहीसलामत बाहेर काढून जंगलात सोडले याची माहिती श्रीमती वायकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.

Leave a Reply