बावनकुळे यांनी २४ तासांत माफी मागावी – अमोल मिटकरी

अकोला : ५ जानेवारी – औरंगजेब याचा औरंगजेबजी असा उल्लेख भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना औरंगजेबजी असा उल्लेख बावनकुळे यांनी केलाय. औरंगजेबजी असा उल्लेख करणाऱ्या बावनकुळे यांना माफी मागावी, अशी मागणी त्यानंतर अमोल मिटकरी यांनी केली. बावनकुळे यांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोल करणार असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, जितेंद्र आव्हाड खोटी प्रसिद्धी घेण्यासाठी स्टंटबाजी करतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. असं म्हणतानाचं त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली.
क्रूरकर्म्या औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या केली. त्या औरंग्याला औरंगजेबजी असं जावयासारखं बोलत होते. अध्यात्मिक आघाडीची माकडं, दीड आणि अडीच फुटाचे आमदार आणि गूड बनविणारी भारतीय जनता पार्टी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.
अमोल मिटकरी म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान करण्याची घाणेरडी परंपरा राज्यात भाजपनं सुरू केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून प्रसाद लाड यांच्यापर्यंत महारष्ट्र पेटून उठला होता.
एक जानेवारीला भीमा कोरेगावला राज्याचा एकही मंत्री आला नव्हता. याचा रोष जनतेच्या मनात होता. तो रोष दुसरीकडं वळविण्यासाठी अजित पवार यांच्या वक्तव्यावर तीन दिवसांपासून भाजप आकांडतांडव करत आहे. भाजपवाल्या अजित पवार यांनी २४ तासांत माफी मागावी, अशा वल्गना करत राहिले. आंदोलनं केली, निषेध मोर्चे केले.

Leave a Reply