चौकशी पूर्ण होईपर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा – अजित पवार

नागपूर : २९ डिसेंबर – वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन अवैधरित्या वाटप केल्याचा आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर विरोधकांनी केला आहे. यावरून विरोधकांनी सतत आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील पाहायला मिळाले. दरम्यान आज पुन्हा एकदा याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
यावेळी सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी काही दलालांच्या माध्यमातून शासकीय जमीन वाटपाची कारवाई केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात मोठ्याप्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे सर्व कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील जमीन वाटपाच्या ऑर्डर काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि संबधित चौकशी होईपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
यावेळी आरोप करतांना अजित पवार म्हणाले की, तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 29 जुलै 2019 रोजी वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. सातत्याने या घटना घडत आहे. वेगळ्या प्रकारचे आदेश असताना देखील या जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यावेळी वाशीम येथील जिल्हाधिकारी यांचा आदेश देखील सत्तार यांनी रद्द केला आहे. तसेच एक महिन्याच्या आत गायरान जमीन नियमित करण्याचे लेखी आदेश सत्तार यांनी दिले होते. त्यामुळे हे नियमबाह्य जमिनीचे वाटप झाले असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

Leave a Reply