दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी मी रुग्णालयात होतो – आदित्य ठाकरे

नागपूर : २३ डिसेंबर – दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एका एकदा राजकारण तापलं आहे. बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी अभिनेता सुशांतसिह राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन करण्यात आला, असा शेवाळेंनी लोकसभेत म्हटलं. यानंतर या वादात भाजपा आमदार नितेश राणेंनी उडी घेतली होती.
गुरुवारी नितेश राणेंनी दिशा सालियान प्रकरण विधानसभेत मांडलं होतं. “कोणाच्या राजकीय राजकीय दबावामुळे दिशा सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.
नितेश राणेंच्या आरोपांना आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “दिशा सालियनचा मृत्यू झाला, त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे मी रुग्णालयात होतो. त्यांना काढायचं ते काढून द्या. पण, सत्य आहे ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घोटाळा काढून हादरवून ठेवलं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
शिंदे गटावरही आदित्य ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. “यांचा मुखवटा फाडून खरा चेहरा दिसत आहे. लाज वाटते आणि किळस येतो, कधीकाळी ते आमच्याबरोबर होतो. बरं झाले तिकडे गेले आणि खरा चेहरा दाखवत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना गुंतवणूक, रोजगारासाठी काम करत होतो. कर्नाटकच्या विरोधात आम्ही बोलत होतो. महाराष्ट्राची ताकद आणि हिंमत दिसत होती. पण, आता कर्नाटक आणि शेतकऱ्यांवर बोलायला तयार नाही,” असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला आहे.

Leave a Reply