नागपूर : २२ डिसेंबर – विधानभवनातील कॅंटीनमध्ये शौचालयातील पाण्याने भांडी धुतली जात असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी व्हायरल केला होता, आज अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेतही हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकारावर गंभीर चिंता व्यक्त करीत सरकारने तत्काळ लक्ष द्यावे अशी सूचना केली. सध्या देशात पुन्हा कोरोनची लाट येऊ बघते आहे, अश्यावेळी चहाचे काप आणि पाण्याचे पेले धुण्यासाठी असे घाणेरडे पाणी वापरावे हे गैर असल्याचे डॉ. गोर्हे म्हणाल्या. सभागृहात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारची तातडीने दाखल घेऊन चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी घोषणा केली. सदर कंट्रीन काँट्रॅक्टरने चहा आणि पाण्यासाठी काचेचे प्याले न वापरता कागदी प्याले वापरावे अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली.