निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव : 20 डिसेंबर – ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जळगाव येथील जामनेर तालुक्यात टाकळी या गावात विजयाची मिरवणूक सुरू असताना वादातून एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज माळी असे या कार्यकर्त्याचं नाव आहे. धनराज माळी हा भाजपचा कार्यकर्ता होता. राज्यासह जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने (BJP) विजय मिळविला आहे. यात जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्व राहिले आहे.
या दरम्यान जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये दोन्हीकडून भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. यात परिवर्तन पॅनलचा विजय झाला. या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मिरवणूक सुरू असताना अचानक एका ठिकाणी दगडफेक झाली. या घटनेत जखमी धनराज ला जामनेर येथील रुग्णाल्यात हलवित असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर जामनेरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली असून नागरिकांचा प्रचंड आक्रोश सुरू आहे या घटनेने जामनेरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयितांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Leave a Reply