ताकद वाढवा, तरच तुम्ही विषारी दारु पचवू शकता – बिहारमधील मंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य

बिहार : १५ डिसेंबर – विषारी दारू प्याल्याने बिहारमधील छपरा जिल्ह्यात ३० जण मृत्युमुखी पडले आहेत. तर, मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी भिती व्यक्त केली जात आहे. अनेक जणांचे डोळेदेखील गेल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे विषारी दारूच्या मुद्द्यावरुन बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली होती. तर एकीकडे त्यांचेच मंत्री समीर महासेठ यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे.
एका क्रीडा विषयक कार्यक्रमात आरजेडीचे मंत्री समीर महासेठ हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांना विषारी दारुमुळं झालेल्या घटनेबद्दल विचारलं असता त्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. खेळात सहभागी होऊन ताकद वाढवा, तरच तुम्ही विषारी दारु पचवू शकता, असं त्यांनी म्हटलं आहे. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर बिहारमध्ये मिळणारी दारू ही विषारी आहे. विषारी दारुने मरण्यापासून वाचायचं असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवा, असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी बिहारमधील जनतेला दारू सोडण्याचे आवाहन केलं आहे. बिहारमध्ये दारूच्या माध्यमातून विष येतेय. काही लोक चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. बिहारमध्ये विष वाटण्यात येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये एप्रिल २०१६पासून दारूबंदी लागू आहे. या पूर्वीही अनेकदा राज्यात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मुद्द्यावरुन बिहार विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी ‘महागठबंधन’वर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. संसदेतही या दुर्घटनेचे पडसाद उमटले आहे.
बहुतेक जणांना छप्रामधील हॉस्पिटलमध्ये आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. चिंताजनक प्रकृती असणाऱ्या काही जणांचा उपचारांदरम्यान मंगळवारी दिवसभरात मृत्यू झाला. या सर्वांनी संशयित विषारी घटक प्राशन केल्याचा संशय आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा तपासणीसाठी मुझफ्फरपूरला न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल, सारणचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सागर दुलाल सिन्हा यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply