कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई : १५ डिसेंबर – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण ट्विट केलं आहे.
कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार आहे, असं ट्विट फडणीवीस यांनी केलंय.
महाराष्ट्राची जी भूमिका सुप्रीम कोर्टात आहे, तीच भूमिका आजही कायम आहे. मराठी भाषिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्र्यांची समिती काम करेल. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची भूमिका ही तटस्थ असली पाहिजे, हे आम्ही सांगितले. ते केंद्र सरकारने मान्य केले, असं फडणवीस म्हणालेत.
मराठी भाषिकांच्या समस्या, त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी, मराठी भाषा जतन करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादी विविध बाबतीत सुद्धा आम्ही मुद्दे मांडले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आमचे नेते,केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी आज पुढाकार घेत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी एक महत्त्वाची बैठक घेतली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे, असं फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
अमित शाह यांनीही सीमावादावर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमावादावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आणि हा वाद घटनात्मक मार्गाने सोडवण्यावर एकमत झाले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणतेही राज्य एकमेकांच्या जमीनीवर दावा करणार नाहीत यावर एकमत झाले, असं अमित शाह यांनी म्हटलंय.
तर राज्यातून येणाऱ्या लोकांना कोणतीही अडचण येऊ नये कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा,यासाठी दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार. जनतेला भडकावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. लोक हितासाठी विरोधी पक्ष यावर राजकारण करणार नाही, याची मला खात्री आहे, असंही अमित शाह म्हणालेत.

Leave a Reply