समृद्धी महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्याचा मृत्यू

नागपूर : १२ डिसेंबर – समृद्धी महामार्गावरील वन्यप्राण्यांसाठीच्या उपशमन योजनांवर पुन्हा प्रश्नचिद्ध निर्माण झाले आहे. उद्घाटनाच्या दिवशीच या महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे.
या महामार्गावरील वन्यप्राण्यांसाठीच्या उपशमन योजना सुरुवातीपासूनच वादात आहेत. वन्यप्राण्यांच्या अधिवासातून हा महामार्ग गेला आहे. महामार्गाचा आराखडा तयार झाला तेव्हाच वन्यप्राण्यांसाठीच्या उपशमन योजनांवर वन्यजीव अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यासाठी राज्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, वनखात्याचे अधिकारी, डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे अधिकारी तसेच राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचा समावेश होता. त्यांनी या महामार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी भूयारी मार्ग, उड्डाणपूल अशा विविध उपशमन योजना सुचवल्या. भारतीय वन्यजीव संस्थेच्या संशोधकांच्या निरीक्षणाखाली त्या तयार करण्यात आल्या. त्यानंतरही या उपशमन योजनांमध्ये त्रुटी होत्या.
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षातही त्या आणून देण्यात आल्या. मात्र, महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करताना वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला. जून महिन्यात या महामार्गावर दोन हरीण धावताना दिसून आले. रविवारी या महामार्गावर चक्क अजगर आढळून आला. त्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर अनेकांनी या महामार्गावर वाहने वेगाने नेली. मात्र, या वेगाने धावणाऱ्या वाहनाने या महामार्गावर वर्धा जिल्ह्यात एका माकडाचा बळी गेला. त्यामुळे उद्घाटनाच्या दिवशीच एका वन्यप्राण्याला त्याचा जीव गमवावा लागला. भविष्यातही हा धोका आहेच. या घटनेने समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी करण्यात आलेल्या उपशमन योजनांमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply