विधवा वाहिनीशी लग्नगाठ बांधत तरुणाने वाहिनीसह मुलांना दिला आधार

अकोला : ३० नोव्हेंबर – समाजासमोर आदर्शन ठेवणारी आणि रूढी परंपरांना छेद देणारी एक चांगली बातमी अकोल्यातून समोर आली आहे. एका तरुणानं आपल्या भावाच्या निधनानंतर आपल्या वहिनीला आणि आपल्या पुतण्यांना आधार दिलाय. विधवा वहिनीचं आणि पुतण्यांचं दुःख त्याला पाहवत नव्हतं, म्हणून त्याने एक पुरोगामी निर्णय घेत आपल्या विधवा वहिणीसोबत लग्नगाठ बांधली. या निर्णयानं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.
मंगेश राऊत आणि राधिका यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांचं वैवाहिक जीवन अगदी व्यवस्थित सुरू होतं. मंगेश आणि राधिका यांना दोन मुलं झाली. मुलगा आता पाच वर्षांचा आहे तर मुलगी ३ वर्षांची. विराट आणि अणू अशी त्यांची नावं आहेत. मंगेश हे शेतकरी होते आणि त्यांच्यावर मोठं कर्जही झालं होतं. त्यातून त्यांनी २३ मार्च २०२२ ला आत्महत्या केली. नवरा मंगेशच्या मृत्यूनंतर राधिका हिच्या समोर मोठी संकटं निर्माण झालं होतं. पण आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा तिनं सौभाग्यवती राहावं आणि तिच्या कपाळावर नेहमी कुंकू हसत राहावं, असा विचार करत कुटुंबीयांनी तिचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यात तिला दोन मुलं आहेत. तिला जगण्याचा आधार मिळावा आणि मुलांचं जीवनही चांगलं सुखदायी व्हावं, यासाठी दिरानेच म्हणजे सुमित राऊत या तरुणाने विधवा वहिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी मृतक मंगेशचा लहान भाऊ सुमित याचं राधिका बरोबर लग्न लावून दिलं. २६ नोव्हेंबरला नातेवाईकांच्या उपस्थित नोंदणीकृत आणि समाज रीतीप्रमाणे हा विवाह पार पडला. अशाप्रकारे विधवा वहिनी आणि दिर लग्न बंधनात अडकले.
कर्जबाजारीपणातून मंगेशनं आत्महत्या केल्याचं सध्या समजतं. तरीही त्याच्या आत्महत्येमागील नेमकं कारण कळू शकलेलं नाही, असं नातेवाईक सांगतात. मोठ्या भावाच्या आत्महत्येनंतर आपल्या वहिनीला जगण्याचा आधार मिळावा. आपल्या विधवा वहिनीवर अशी कोणतीही वेळ येऊ नये अन् दोन्ही पुतण्यांना वडिलांचं प्रेम मिळावं म्हणून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत विधवा वाहिनीशी लग्न करून समाजापुढे एक वेगळा आदर्श सुमितने ठेवला आहे. एवढचं नव्हे तर मंगेशवर असलेलं कर्जही सुमित फेडत आहे. या निर्णयामुळे सर्वत्र सुमितचं कौतुक होत आहे.

Leave a Reply