अजित पवार पाच दिवसांपासून नॉट रिचेबल!

मुंबई : ९ नोव्हेंबर – एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याचं समोर येत आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीरालाही विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर होते. यावर चार तारखेला शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबीरातुन अजित पवार आजोळी गेले आहेत, असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. मात्र अजितदादा आपल्या आजोळी देवळाली प्रवरा येथे पोहचलेच नाही. मग अजितदादा गेले कुठे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून अजितदादा नॉट रिचेबल असल्यानेराजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशनालाही शिर्डीत अजित पवार हजर नव्हते. या शिबीरात पहिल्या दिवशी अजित पवार यांचं जवळपास दीड तास भाषण झालं. त्यानंतर ते शिर्डीतून निघून गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णालयातून थेट शिबीराला हजेरी लावली होती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट शिर्डीत पोहोचले होते. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर होते. यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आलं.
या सर्व चर्चांदरम्यान मनसे नेत्याच्या ट्विटने लक्ष वेधलं आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की “मिटकरी राजसाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारण्या अगोदर अजितदादा हे पवारसाहेबांवर नाराज होवून काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का ? याचा खुलासा करावा..अजितदादांनी कंपू बदलला तर पळता भुई थोडी होईल तुमची”

Leave a Reply