75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात , 2 हजार जणांना मिळाले नियुक्तीपत्र

मुंबई : ३ नोव्हेंबर – महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार नोकऱ्या देण्याचा निश्चय सरकारचा आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. 2 हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील. पण हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका किंवा स्थगिती आणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. या महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. आज दोन हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यातील तरुणांच्या रोजगाराच्या पूर्ततेची सुरुवात राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकार आपल्या केंद्रीय विभागात 10 लाख नोकऱ्या देणार आहे. राज्यानेही आपल्या राज्यात तरुण तरुणींना रोजगार द्याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्यानंतर पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे”.
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार 75 हजार जागा भरणार आहे. शासकीय नोकरीत अघोषित बंदी आहे ती संपवावी असा निर्धार सरकारने केला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
येत्या काळात साडे 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात काढत आहोत. ग्राम विकास विभागतदेखील आपण काही पदं भरणार आहोत. सरकारी नोकऱ्या या पारदर्शी झाल्या पाहिजेत. मागच्या काळात जे घोटाळा पाहायला मिळाले तसे होणार नाही. देशात ज्या बेस्ट एजन्सी आहेत त्यांना काम दिलं पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशात 80 हजार स्टार्ट अप मधील 15 हजार स्टार्ट अप महाराष्ट्रात. रोजगार देणारे स्वयंरोजगार तयार करायचे आहेत. राज्याची स्टार्टअप पॉलिसी तयार केली आहे. स्टार्ट अप तयार करून त्याचा विस्तार करण्यासाठी वित्त पुरवठा करत आहोत, असं फडणवीसांनी सांगितलं.
नोकरभरतीच्या प्रक्रियेसाठी दोन एजन्सी आपण नेमल्या आहेत. एक TCS आणि IBPS ही कंपनी आपण नेमली आहे. लवकरच आपण परीक्षा घेणार आहोत. आधी सर्व गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे अशा आम्ही सूचना दिल्या आहेत. कुठल्याही कोर्ट केसेस न होता पारदर्शक पणे भरती झाली आहे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
75 हजार जागा एका वर्षात भरण्याचे आम्ही ठरवले आहे. नंतर छोट्या छोट्या भरती प्रक्रिया करू. चुका होऊ नये आणि पारदर्शी पद्धतीने ही भरती आपण करत आहोत. 75 हजार रोजगाराच्या महामेळाव्याची ही सुरुवात आहे. येत्या काळात आपण चांगल्या पद्धतीने आपण ही भरती करणार आहोत. रोजगार महामेळाव्याचे आयोजन आपण ठरवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महासंकल्प कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply