पेंच व्याघ्रप्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्कार

नागपूर : १६ ऑक्टोबर – व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात इको-रिस्टोरेशनचा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल पेंच व्याघ्रप्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, शिकारीविरोधात केलेल्या आक्रमक आणि यशस्वी कारवायांकरिता नागपूर प्रादेशिक वनविभागालादेखील सन्मानित करण्यात आले आहे.
पेंच व्याघ्रप्रकल्पांतर्गत तोतलाडोह वसाहत क्षेत्रात इको रेस्टोरेशन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. विविध शासकीय यंत्रणांचा या प्रकल्पात सहभाग आहे. या प्रकल्पाच्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
हा प्रकल्प राबविताना २७२ हेक्टर जमिनीची निवड करण्यात आली. या वनप्रदेशातील वनस्पती, प्राणी आणि इतर वन्यजिवांची माहिती एकत्र करण्यात आली. येथील वसाहतीतील ५६ जुन्या इमारती नष्ट करण्यात आल्या आणि सगळ्या मलबाही हटविण्यात आला.
या जंगलात उगवलेल्या अनावश्यक वनस्पती, गवत याचेदेखील उच्चाटन करण्यात आले. काळी माती आणि सेंद्रीय द्रव्ये वापरून जमिनीची मशागत करण्यात आली.
या भागात वृक्षारोपण करणे आणि कुरणनिर्मिती याकरिता रोपवाटिकादेखील करण्यात आली. येथे मियावाकी पद्धतीने अटल घनवन योजनेंतर्गत वृक्षारोपण आणि कुरणनिर्मिती करण्यात आली.
बंधारे बांधणे, वनतलाव तयार करण्यात आले, मृदासंवर्धन अशा विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. पडीक वनजमीन असलेल्या या भागात आता हिरवाई निर्माण झाली असून वन्यजीवदेखील दिसू लागले आहेत. या संपूर्ण कामासाठी पेंच व्याघ्रप्रकल्पाना सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नागपूर प्रादेशिक वनविभागाचाही या पुरस्कारांतर्गत सन्मान करण्यात आला आहे. या विभागाला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांची शिकार थांबविण्यासाठी वनविभागाला मागील दोन ते तीन वर्षांत सातत्याने प्रयत्न केले. वारंवार कारवाया करून अनेक शिकाऱ्यांना जेरबंद केले तसेच प्राण्यांचे अवयवही जप्त केले.
वाघ, खवल्या मांजर, बिबट, स्टार टॉरटाइज आणि इतर प्राण्यांची शिकार किंवा तस्करी करणाऱ्यांविरोधाक २४ कारवाया केल्या. त्या कारवायांदरम्यान १३०पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती. या कामाची दखल घेऊन नागपूर प्रादेशिक वनविभागाला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ देण्यात आले आहे.
स्कॉच समूह ही १९९७पासून सर्वसमावेशक वाढीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक समस्या हाताळणारी भारतातील अग्रगण्य संस्था आहे. त्यांच्याबरोबर फॉर्च्युन-५०० कंपन्या, सरकारी मालकीचे उद्योग संलग्न आहेत.
स्कॉच समूहाच्यावीने सेवांमध्ये क्षेत्रीय हस्तक्षेप, सल्ला, संशोधन अहवाल, प्रभाव मूल्यांकन, पुस्तक प्रकाशन, जर्नल्स, कार्यशाळा आणि परिषदा इत्यादी सेवा पुरविल्या जातात. याशिवाय, वित्त, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरणक्षेत्रातील पुरस्कार आणि सन्मानही देण्यात येतात.
यंदाच्या पुरस्कारासाठी पहिल्या टप्प्यावरील कार्यवाही मार्च २०२२पासून सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात सादरीकरणासाठी निवड, तिसऱ्या टप्प्यात राबविलेल्या उपक्रमाच्या पडताळणीसाठी निवड, चौथ्या टप्प्यात तज्ज्ञांचे मत व उपक्रमाची लोकप्रियता याचे गुणांकन, पाचव्या टप्प्यात समस्या व त्या सोडविण्याकरिता करण्यात आलेले उपाय, त्याचे परिणाम तसेच अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने, नवकल्पना व प्रतिकृती आदींचे सादरीकरण करण्यात आले.
विविध शासकीय विभागांना या पुरस्कारासाठी सादरीकरण करावे लागले. विविध टप्प्यातील मूल्यांकनानंतर पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

Leave a Reply