नागपूर : १२ सप्टेंबर – राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये विदर्भात वीज पडून सहा नागरिकांचा मृत्यू झाला. यात नागपूर जिल्ह्यातील दोघांचा तर चंद्रपूर जिल्ह्यामधील तीन आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. बैलगाडीवर घरी परतणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर वीज पडली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
विदर्भामध्ये पावसाने धुमसान घातले आहे. रविवारी दिवसभर संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मांगली गावातील सोमेश्वर पोपटकर आणि गुंडेराव गेडाम हे रेंगीने शेतातून घरी बैलगाडीवर परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
गुंडेराव यांचा मृतदेह चालत्या रेंगी मधून खाली कोसळला. तर सोमेश्वर पोपटकर यांचा मृतदेह रेंगीवर अडकून राहिला. वीज कोसळल्याची बैलांना कल्पना नव्हती त्यामुळे बैलगाडी मालकाचा मृतदेह घेऊन थेट घरी पोहोचले. तेव्हा वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गावकऱ्यांना कळली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.