भाजपचे मुंबई प्रेम बेगडी – अंबादास दानवे यांची टीका

मुंबई : ५ सप्टेंबर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. नुकतचं त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या अगामी निवडणुकीसंदर्भात हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. “अमित शाह यांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम केलं आहे. मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला महत्व देण्याचं काम भाजपाकडून केलं जात असल्याची” टीका दानवेंनी केली आहे.
मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन सुरु न करता दिल्ली- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु केली. याचा अर्थ मराठी माणसांवरचे प्रेम आणि मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला ते देण्याचे काम सुरू आहे. भाजपाच्या ताब्यत अख्खा देश असताना त्यांना मुंबई महानगरपालिका कशासाठी हवी आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केवळ बैठका घेऊन काहीच होत नसल्याचे कळाल्यानंतर भाजपाने शिवसेनेत फूट पाडून ४० आमदारांना आपल्याकडे वळवलं. पुन्हा ते मनसेच्या मागेसुद्धा लागले आहेत. त्यामुळे भाजपाची ताकद अपुरी पडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, महाराष्ट्राची नवी जनता शिवसेनेसोबत राहणार असा विश्वासह त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकार असताना अनेक निर्णयांचा पाठपुरावा केला. मात्र राज्यपालांनी तत्परता दाखवली नाही. आता शिंदे-फडणवीसांच्या काळात प्रलंबित १२ आमदारांच्या यादीवर निर्णय लवकर होणार आहे. यावरून राज्यपालांची तत्परता दिसून येते, असा टोला दानवेंनी भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे. म्हणजे ज्या निर्णयांसाठी दोन-दोन, तीन-तीन वर्ष वाट पाहावी लागत होती, ते निर्णय दोन-तीन मिनिटांत घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात याविषयी निश्चित भूमिका घेऊ, असे ते म्हणाले. सामना हे ज्वलंत विचाराचे वर्तमानपत्र आहे. त्याचे विचार देशपातळीपर्यंत पोहोचतात, असेही दानवे यावेळी म्हणाले.

Leave a Reply