कृषिमंत्री मेळघाटात असतानाच शेतकऱ्याने केली आत्महत्या

अमरावती : १ सप्टेंबर – अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या दौऱ्यावर आहे. रात्री सत्तार यांनी एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. पण, ज्या ठिकाणी सत्तारांनी मुक्काम केला होता, तिथून अवघ्या 6 ते 7 किलोमिटर अंतरावर एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. सत्तार यांनी साद्राबाडी गावात एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला होता. पण, तिथे सत्तारांनी मुक्काम केला तिथून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मेळघाटातील लाकडु गावात अनिल ठाकरे या 26 वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गावाजवळ विष प्राशन अनिल ठाकरे या शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मृतक युवा शेतकऱ्याकडे 6 एकर शेती असून त्याचं मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहेत. धारणी येथील रुग्णालयात मृतक शेतकऱ्याचे नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान, शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले नाही, असा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख शैलेंद्र मालवी यांनी केला आहे. तसंच, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि शेतकरी आत्महत्याला दोषी असलेल्या धारणी येथील कृषी अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply