पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला कृषी सहायक व तलाठ्याने दिले जीवनदान

गोंदियाः १६ ऑगस्ट – जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बाह्मणीअंतर्गत झासी नगर येथे शेतात असलेल्या घरात पुराच्या पाण्याने वेढा घातला आणि त्यात शेती काम करीत असलेला शेतकरी अडकला. या शेतकऱ्यास कृषी सहाय्यक व तलाठी यांनी जीवनदान देत बाहेर काढले आहे.
गोंदिया जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे शेतकरी रामलाल मोडकु सलामे हे दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी कुटुंबीयांसह शेतात असलेल्या घरी होते. झाशी नगर नजीक असलेल्या नाल्याला अचानक पूर आल्यामुळे ते घरातून बाहेर निघू शकले नाहीत. ही बाब गावातील युवा शेतकरी महेंद्र चुटे हे दुध संकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ गावातील शेतकरी गटाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सदर घटनेची माहिती दिली.
त्यानंतर तात्काळ गटातील शेतकरी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेतली. युवा शेतकरी गटाचे सदस्य यांना कुटुंबातील ३ सदस्यांसह पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू असताना अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे रामलाल मोडकु सलामे यांचे बचावकार्य थांबवण्यात आले गेले. तो पर्यंत कृषी सहाय्यक राजशेखर राणे व तलाठी राजू उपरीकर घटनास्थळी हजर झाले व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुराच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यापर्यंत पोहचले.
अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांना पुरातून बाहेर काढण्यात त्यांना यश आले. स्वतः चे प्राण धोक्यात टाकून केलेल्या बचाव कार्याचे कौतुक केले जाते. शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

Leave a Reply