मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांच्या सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द, तातडीने दिल्लीला रवाना

मुंबई : ४ ऑगस्ट – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटासंदर्भातील याचिकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुपारच्या सुमारास फडणवीस हे त्यांच्या मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावरुन विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज दिल्लीमध्ये ते भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. फडणवीस यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द झाली तर भाजपासमोर काय पर्याय आहेत यासंदर्भातील चर्चाही या बैठकीदरम्यान होऊ शकते असं म्हटलं जातंय. सत्ता स्थापनेसंदर्भातील पर्यायांचा न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर आढावा या बैठकींमध्ये घेतला जाऊ शकतो असं या विषायसंदर्भातील जाणकार सांगत आहेत.
महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये भाजपाचा वाटा सर्वात मोठा असून भाजपाचे १०६ आमदारांंच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. या सत्ता स्थापनेमध्ये अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply