शिंदे गटात प्रवेश नसून निव्वळ फसवणूक, मनसैनिकांचा दावा

नवी मुंबई : ३ ऑगस्ट – सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेते-पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा हात धरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही या सत्तांतराचा फटका बसल्याचं चित्र काल निर्माण झालं होतं. पनवेल, उरणमधील मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त काल समोर आलं होतं. मात्र हा पक्षप्रवेश नसून निव्वळ फसवणूक असल्याचा दावा पनवेलमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत, असं मनसे पदाधिकारी रवी बाळू पवार आणि रोहित विकास कोरडे यांनी व्हिडिओ जारी करत सांगितलं.
“काल आम्ही शिंदे गटात पक्षप्रवेश केल्याचं वृत्त खोटं असून ती निव्वळ फसवणूक होती. आमच्यासोबत ३०-४० जण होते. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी सांगितलं की आपल्याला तिथे जायचंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचंय, सविस्तर चर्चा करुन निवेदन द्यायचंय, मात्र असं काही नसून तिथे आम्हाला सांगितलं की आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे.” असा दावा मनसे पदाधिकारी रवी बाळू पवार आणि रोहित विकास कोरडे यांनी केलाय.
“आम्ही स्पष्ट नकार देत मागे हटलो. आम्ही आजही राज साहेबांसोबत आहोत आणि उद्याही राहणार आणि सदैव असू. शेवटच्या श्वासापर्यंत मनसेसोबत राहू. राजसाहेब आमचे दैवत आजही आहेत, उद्याही राहतील, अखेरच्या क्षणापर्यंत असतील” असंही मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
पनवेलमधील मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह उरण तालुका उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, कामगार सेनामधील पदाधिकारी, उपशहर प्रमुखांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याचे फोटो समोर आले होते. पनवेल, उरणमधील मनसेच्या एकूण १०० पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचं बोललं जात होतं. मात्र आपल्याला फसवून पक्षांतर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply