कोल्हापुरात स्टेजवरून खाली उतरत आदित्य ठाकरेंचे दमदार भाषण

कोल्हापूर : २ ऑगस्ट – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संपूर्ण राज्यभरात शिवसंवाद यात्रा सुरू आहे. कालपासून ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. येथील आजरा येथे झालेल्या सभेनंतर कोल्हापुरातील सभेलासुद्धा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे झालेल्या सभेत तर जनतेचा आपल्याला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून आणि भरपावसातसुद्धा नागरिकांनी लावलेली उपस्थिती पाहून आदित्य ठाकरे यांनी स्टेजवरून खाली येऊन जनतेतून दमदार भाषण केले. शिवाय बंडखोर आमदार आणि खासदारांसह भाजप आणि विद्यमान राज्यपालांवरसुद्धा जोरदार टीका केली. आजसुद्धा शिरोळ येथे सभा होणार असून, त्याचीसुद्धा जोरदार तयारी करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, काल दुपारी आजरा येथे झालेल्या सभेला त्यापेक्षाही अधिक गर्दी पाहायला मिळाली. सभास्थळी आसनव्यवस्थासुद्धा करण्यात आली नव्हती. तरीही ठाकरे येण्यापूर्वी तासभर सभास्थळी उभे असल्याचे दिसून आले. शिवाय बंडखोरांविरोधात शिवसैनिकांमध्ये असलेली चीडसुद्धा या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली. कोल्हापूर शहरातसुद्धा रात्री मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
कोल्हापूर शहरात पार पडलेल्या भव्य सभेमध्ये शिवसेनेचे दोन माजी आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली. करवीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी या सभेला येणे टाळल्याचे दिसले. शिवाय वेळोवेळी कोल्हापुरात झालेल्या मोर्चामध्येसुद्धा यांनी सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply