विकास ठाकरेंविरोधात नागपूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दिल्लीत तक्रार

नागपूर : २९ जुलै – काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांना ताबडतोब शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी ठाकरे यांचे पक्षांतर्गत विरोधक दिल्लीत वरिष्ठ नेत्याला भेटून नागपुरात परतले.
पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कुण्या एका व्यक्तीने एकाच पदावर राहू नये, असा ठराव काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरामध्ये करण्यात आला. तसेच एका व्यक्तीकडे एक पद असाही एक ठराव होता. या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी शिर्डी येथे प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होता. प्रदेश काँग्रेसच्या या शिबिरात सर्व पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष पदावर असलेल्या शहराध्यक्षांचा राजीनामा घेण्यात आला. तसेच एकापेक्षा जास्त पदावर असलेल्या नेत्यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली.
विकास ठाकरे यांनी सुद्धा शिर्डीच्या चिंतन शिबिरात राजीनामा दिला, परंतु प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या ऐवजी नवीन अध्यक्ष नियुक्त केला नाही. त्यामुळे विकास ठाकरे हे शहराध्यक्ष म्हणूनच कार्यरत आहेत. असे करणे म्हणजे उदयपूर चिंतन शिबिराचा अवमान आहे असे सांगून पक्षश्रेष्ठींकडे विकास ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार करण्यात आली.
माजी आमदार अशोक धवड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, कमलेश समर्थ, संजय दुबे, के. के. पांडे आदींनी दिल्लीत जाऊन अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणू गोपाल आणि महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

Leave a Reply