संपादकीय संवाद – उद्धवपंत संजय राऊतांना आता आवरा

शिवसेनेत नुकतेच बंड झाले, या बंडाला उद्धव ठाकरेंच्या भोवती असलेली चौकडी कारणीभूत असल्याचा आरोप काल बंडखोर आमदारांनी विधिमंडळात बोलतांना केला. तेव्हापासून ही चौकडी कोण याबाबत माध्यमांमध्ये तर्क कुतर्क केले जात होते, राज्यसभा सदस्य संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब आणि सुभाष देसाई यांची नावे घेतली जात होती.
आज मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सरळ सरळ संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी घेतल्याचाच आरोप केला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत तर भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलतांना भाजप शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप केला होता. आज संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांनीच शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
संजय गायकवाड यांनी केलेला हा आरोप गंभीरच म्हणावा लागेल. त्यात तथ्य किती? हे कालांतराने समोर येईलच मात्र संजय राऊतांवर सध्या आरोप सातत्याने केले जात आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही, याला कारण राऊत यांची शैली ही म्हणावी लागेल. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक झाल्यास त्याची टिंगल टवाळी होते, तसेच संजय राऊत यांच्याबाबतीतही घडते आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरेंना संजय राऊत हे फार विश्वासू वाटतात, त्यामुळे शिवसेनेचे मात्र नुकसान होते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा हे जाणून घेतील तेव्हा शिवसेनेची स्थिती सुधारायला सुरुवात हहोईल त्यामुळे उद्धव पंतांनी संजय राउतांना आता आवरायलाच हवे.

अविनाश पाठक

Leave a Reply