शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पराभूत होणार – रवी राणा

मुंबई : २० जून – आज सकाळी नऊ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. मतांचं गणित पाहता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येतील, असं चित्र आहे. असं असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे.
शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पराभूत होणार असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रवी राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, “राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांना जी मतं मिळाली, ती फक्त एकनाथ शिंदे यांच्या मेहनतीमुळे मिळाली आहेत. पण आज एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्याप्रकारे विधान परिषद निवडणुकीची मांडणी केली आहे. ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पडणार आहे. गेल्या ५६ वर्षात जे घडलं नाही, असा धक्का शिवसेनेला विधान परिषदेत बसणार आहे. तसेच भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील,” असंही ते म्हणाले.
विधान परिषदेत मी भाजपाला मतदान करू नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर दबाव टाकत आहेत, असा आरोपही राणा यांनी केला आहे. त्यासाठी ठाकरे यांनी मुंबई आणि अमरावतीचे पोलीस आपल्या घरी पाठवले होते. पण मी घरी नसल्याने पोलीस मला अटक करू शकले नाहीत, असंही ते म्हणाले.

Leave a Reply