सदाभाऊ खोत यांची विधानपरिषद निवडणुकीतून माघार

मुंबई : १३ जून – विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी ५ मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. खोत यांच्या माघारीनंतर आता भाजपचे ५ अधिकृत उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील. म्हणजेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असतील.
भाजपकडे सध्या १०६ संख्याबळ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. या गणितानुसार, भाजपचे पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी १०८ मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी २७ मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामध्येच भाजपची बरीच दमछाक होईल. हीच परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना अर्ज माघारी घ्यायला लावला. फडणवीसांच्या सांगण्यानुसार सदाभाऊ खोत यांनी दुपारी पावणे तीन वाजता आपला अर्ज माघारी घेतला आहे.
सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर ९ जून रोजी अर्ज दाखल केला होता. फडणवीसांच्या सांगण्यानुसार अर्ज भरलाय. त्यांनी सांगितलं तर पुन्हा माघारही घेऊ, असंही त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.
सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता भाजपचे अधिकृत ५ उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात असतील. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार आता विधान परिषदेची निवडणूक लढवतील.

Leave a Reply