लोकांच्या मनात असलेला विश्वास कायम राखणे हेच न्यायपालिकेवरचे मुख्य आव्हान – न्या. रमण

नवी दिल्ली : २४ एप्रिल – ‘तात्काळ न्याय’ मिळण्यासाठी आपण झगडलो, तर खरा न्याय मिळण्यावर विपरीत परिणाम होईल, असे मत सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी व्यक्त केले. देशाच्या न्याययंत्रणेवर परिणाम करणारे अनेक मुद्दे आपण उपस्थित करत आलो असून, हल्ली न्यायपालिकेसह सर्वच संस्थांपुढील मुख्य आव्हान हे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असललेला विश्वास कायम राखणे हे आहे, असे न्या. रमण यांनी सांगितले. न्यायदानात अधिक सर्वसमावेशकता आणणे आणि न्यायप्रक्रियेतील भाषेचे अडथळे दूर करणे यालाही आपण महत्त्व देतो, असे ते म्हणाले.
तमिळनाडूतील न्यायपालिकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि मद्रास उच्च न्यायालयासाठी ९ मजली प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘कायद्याचे राज्य कायम ठेवणे, तसेच कार्यपालिका आणि विधिमंडळ यांच्याकडून होणाऱ्या अतिरेकावर नियंत्रण ठेवणे अशी मोठी घटनात्मक जबाबदारी न्यायपालिकेकडे सोपवण्यात आली आहे. घटनात्मक मूल्ये कायम राखणे व त्यांची अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे. हे एक मोठे ओझे आहे यात काहीच शंका नाही. मात्र आम्ही घटनात्मक शपथ घेतली, त्याच दिवशी आम्ही ते आनंदाने स्वीकारले आहे. यामुळेच, न्यायिक संस्था बळकट करण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. न्यायदान करणे हे केवळ घटनात्मक कर्तव्य नसून सामाजिक कर्तव्यही आहे’, असे सरन्यायाधीश म्हणाले. ‘न्यायाची प्रक्रिया आणि आपल्या प्रकरणाबाबतची घडामोड हे पक्षकारांना कळलेच पाहिजेत. एखाद्या विवाहात मंत्र म्हणण्यासारखे ते असू नये’, असे ते म्हणाले.

Leave a Reply