आ. अमोल मिटकरी यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

सांगली : २१ एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा मंगळवारी इस्लामपूर येथे पोहोचली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मिटकरी यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या भाषणाची नक्कल केल्याने उपस्थितांमध्ये मोठा हास्यकल्लोळ झाला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. तसंच राज यांनी मागील काही काळापासून घेतलेल्या अन्य भूमिकांमुळे ते मराठीच्या मुद्द्याकडून हिंदुत्वाकडे वाटचाल करत असल्याचं बोललं आहे. राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेचा अमोल मिटकरी यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. राज यांचा उल्लेख खाज ठाकरे असा करत अमोल मिटकरी म्हणाले की, ‘एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम होती. आता भाजपची ‘सी’ टीम मैदानात आली आहे. या पक्षाने मराठी-अमराठी करून पाहिलं, पण यश येत नाही म्हणून आता त्यांनी नवा मुद्दा हाती घेतला आहे,’ अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.
दरम्यान, यावेळी अमोल मिटकरी यांनी मनसेच्या राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्रही म्हणून दाखवलं.
अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर सभा घेणारे देवेंद्र फडणवीस कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर कुठे पळून गेले, असा खरपूस सवाल मिटकरी यांनी विचारला आहे.

Leave a Reply