राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत – रोहित पवारांचा सल्ला

पंढरपूर : ७ एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. भाजप जवळ गेलेल्या नेत्याला आणि पक्षाला संपवतात हा इतिहास, राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत, असं आमदार रोहित पवार म्हणाले. शब्द मोजून आणि जपून वापरले पाहिजेत. सातत्याने शिवराळ भाषा वापरणाच्या मागच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, असं म्हणत रोहित पवार यांनी पाठराखण केली.
महाराष्ट्रात भाजपला आणण्यात शिवसेनाच जबाबदार आहे. पक्षवाढीच्या नावाखाली भाजपने शिवसेनेला पुन्हा संपवण्याचा प्रकार सुरू केला आहे. आता ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपशी सलगी वाढवत असल्याने त्यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला. कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या भक्तनिवास भूमिपूजनासाठी आज रोहित पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे आता जातीय तेढ निर्माण करणारी भाजपाची भाषा करत आहेत. मात्र, भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला किंव्हा पक्षाला संपवले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत, असं रोहित पावर राज ठाकरेंना म्हणाले.
सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत, असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असभ्या आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरही रोहित पवार बोलले. संजय राऊत यांनी भावनिक होऊन शब्द वापरले. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या भावनांचा विचार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली असली तरी बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजप आता मतदारांना ‘ईडी’ची धमकी देत आहे. मात्र कोल्हापूरचा मतदार भाजपच्या या धमक्यांना घाबरणार नाही. निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात ‘ईडी’ कडे तक्रारी करत असल्याचे निदर्शनास आणले. राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण सोपे नव्हते आणि ३५ वर्षांच्या सवयी लगेच बदलत नसतात, असा खुलासा करत अजूनही स्थानिक पातळीवर वाद असल्याची कबुली आमदार रोहित पवार यांनी दिली.

Leave a Reply