महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ – राजू शेट्टी

नागपूर : २४ मार्च – महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, जरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोडली तरी आम्ही भाजपकडे लगेच जाऊ असं होऊ शकत नाही. भाजपनं चांगलं काम केलं असतं तर त्यांच्यापासून दूर झालोच नसतो असंही राजू शेट्टी म्हणाले.
अमरावती जिल्ह्यातील वरूड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे हे जाणून घेऊन त्यांच्याबद्दलचा निर्णय घेऊ. ते पक्षासाठी सक्रिय नाही अशी कार्यकर्त्यांच्या भावना असून त्यांची भूमिका जाणून घेऊ असंराजू शेट्टी म्हणाले. आज वरूडला कार्यकर्त्यांना भेटणार आहोत.आमदार भुयारबद्दल त्यांच्या काय तक्रारी आहेत हे जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असंही शेट्टी म्हणाले.
केंद्र सरकारने भूसंपादनाच्या पाच पट मोबदल्याचा कायदा दोन पटीवर आणला. कर्जमाफी-पिकविमा, दिवसा वीज हे महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा काढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. तसंच ऊस उत्पादकांच्या एफआरपीचेही राज्य सरकारने तुकडे केलं, असंही स्वाभिमानीचं मत आहे.
राजू शेट्टींनी गेल्या आठवड्यातही महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचं काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही. या सगळ्या गोष्टींची समीक्षा येत्या 5 एप्रिलला करणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ.”

Leave a Reply