एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही – नितीन गडकरी

नागपूर : १७ मार्च – गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळापासून ते नितीन गडकरींच्या घरापर्यंत फडणवीसांची रॅली काढण्यात आली. यानंतर नितीन गडकरींच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. गोव्यात मिळालेल्या यशासाठी गडकरींनी फडणवीसांचं अभिनंदन करत तोंडभरुन कौतुक केलं. महत्वाचं म्हणजे पर्रीकरांच्या काळातही इतर पक्षांचं समर्थन घ्यावं लागत होतं असं ते मंचावरुन संबोधित करताना म्हणाले.
पाच राज्यांमध्ये झालेल्या या महत्वाच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपाला नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वात अभुतपूर्व यश मिळालं असून पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारं आहे,” असं गडकरी म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “अनेकजण पाच राज्यांमध्ये निवडणुका कठीण असल्याचं बोलत होते. खासकरुन गोव्याच्या बाबतीतही बोललं जात होतं. मी १९९५ पासून तिथे काम करत आहे. अनुकूल स्थितीत असतानाही आपल्याला इतक्या जागा मिळाल्या नाहीत. पर्रीकर असतानाही आम्हाला इतरांचं समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पण यावेळी गोव्याच्या जनतेने भाजपाला पूर्ण बहुमत दिलं. प्रभारी म्हणून फडणवीसांकडे नेतृत्व होतं. फडणवीस आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात गोव्यात अभुतपूर्व यश मिळालं असून यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो”.
यावेळी गडकरींना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधत म्हटलं की, “गोव्यात अनेक पक्ष उतरले होते. भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या जनेतेमध्ये त्यांचं काय स्थान आहे हे समोर आलं. यानिमित्ताने हीदेखील एक चांगली गोष्ट घडली”.
“गोव्यात महाराष्ट्रातील कार्यकर्ते भेटले. फडणवीसांच्या नेतृत्वात काम केलेल्या या सर्वांचं मी अभिनंदन करतो. हा विजय आता थांबवणार नाही. ही विजयाची पताका एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे,” असं गडकरी यावेळी म्हणाले.
“नागपूर शहरात आपली परीक्षा होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना बावनकुळे पालकमंत्री होते. त्यांनी शहरासाठी खूप काम केलं. मागील वेळी पालिकेत जे यश मिळालं त्यापेक्षा मोठं यश भाजपाला मिळवून देऊ असा संकल्प करुयात,” असं आवाहन गडकरींनी यावेळी केलं.
“उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात अभुतपूर्व यश मिळालं. जात पंत, धर्म, भाषा, पक्ष यापलीकडे जाऊन आपल्या भविष्यसाठी भाजपावर विश्वास दाखवला हेच या निवडणुकीतं वैशिष्ट्य आहे. मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकारने मणिपूमध्ये केलेल्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केलं. आम्ही नक्कीच विकासासाठी भाजपासोबत राहू असं जनतेने सांगितलं आहे. जात पंत, धर्म भाषा यापेक्षा लोक आपलं भविष्य आणि विकासासाठी मत देतात हे स्पष्ट केलं आहे,” असं गडकरींनी सांगितलं. आपण जातीयवादाचं राजकारण नष्ट केलं आहे असंही ते म्हणाले.
“कार्यकर्ता हा जातीने, धर्माने नव्हे तर कार्याने, कतृत्वाने आणि गुणाने श्रेष्ठ असल्याच्या संकल्पनेवर आपला विश्वास आहे. विकासाच्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे. आपला देश सुपर इकॉनॉमिक पॉवर कशी होईल हे मोदींचं स्वप्न असून त्यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत. यावेळी कोणताही जातीयवाद, पक्षीय भेद न आणता सबका साथ, सबका विश्वास आपण मांडला आहे. यामधून हिंदुस्थानच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे,” असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply