वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू

वर्धा : १० मार्च – वाघाच्या हल्यात तरुण शेतमजुराचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना कारंजा (घाडगे) तालुक्याच्या कन्नमवार परिसरात घडली. शेतकरी हा दुपारी बारा वाजताच्या सुमारास शेतात बकऱ्यांसाठी चारा कापत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यात लक्ष्मण महादेव उके (35) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला.
वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचत मृताच्या आई व पत्नीने हंबरडा फोडला. यावेळी गावातील नागरिकांनी घटनेबद्दल रोष व्यक्त करत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. वाघाचा वावर असतांना शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेती करावी लागते. रात्रीला विद्युतपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांना वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जीव जाण्याची भीती असल्याचेही म्हणाले. घटनेनंतर मृताच्या पत्नीला नोकरी देण्यात यावी अन्यथा मृतदेह उचलण्यात येणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.
त्यामुळे काही काळ तणावाचा वातावरण निर्माण झाले होते. मृताच्या पत्नीला तीन महिन्यात रोजगार उपलब्ध करुन देणार, असे आश्वस्त केल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. तसेच पाच लाखांचा मदतीचा धनादेश वन विभागाकडून देण्यात आला. तसेच आजपासून वन विभागाच्या वतीने पथक तयार करून वन्यप्राणी जंगलाच्या दिशेने हाकलून लावण्याचे काम केले जाणार, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक गजानन बोबडे यांनी दिली

Leave a Reply