विरोधकांनी कितीही गोंधळ केला, तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही – जयंत पाटील

मुंबई : २ मार्च – राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक प्रचंड गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे. विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असं जयंत पाटील यांनी ठणकावले आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मलिक यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच ठणाठणी होण्याची चिन्हे दिसत आहेत. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.
नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणावरही भाष्य केलं. शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply