विदर्भातील शेतकरीपुत्र झळकला फोर्ब्सच्या यादीत

बुलडाणा : ८ फेब्रुवारी – महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य फाउंडेशनचा संस्थापक आणि सीईओ ‘राजू केंद्रे’ यांची फोर्ब्सच्या सामाजिक कार्य उद्यमशीलता या कॅटेगरी मध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत निवड झाली आहे. २८ वर्षीय राजू सध्या ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिपवर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेत आहे. भटक्या समाजातील आणि शेतकरी पुत्राला अशा यादीत कदाचित पहिल्यांदाच हा मान मिळत आहे.
राजू केंद्रे हा महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे ह्या छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजातून येतो. राजुच्या आई वडिलांचे शिक्षण प्राथमिक ही झालेलं नाहीये. राजूच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढे कलेक्टर व्हावं म्हणून पदवीच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला. कुणी मार्गदर्शक नसल्याने खूप चकरा मारूनही हॉस्टेल मिळालं नाही.
फर्ग्युसन सारख्या कॉलेजची तारीख निघून गेली. बीपीओ मध्ये वगैरे काम करायचा प्रयत्न केला पण तिथेही वैदर्भीय भाषेचा टिकाव लागला नाही. अवघ्या काही महिन्यात पुणे सोडावं लागलं. पुणे विद्यापीठातली अँडमिशन मुक्त विद्यापीठात शिफ्ट करावी लागली. आजही क्षमता असतानाही ह्या व्यवस्था व परिस्थितीसमोर मुकणारी अशी भरपूर विद्यार्थी आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात आपल्याला दिसतील. म्हणूनच त्यावर काम करण्यासाठी अवघ्या विशीत राजूला संघर्षाचं प्रतीक असणार ‘एकलव्य’ नाव घेऊन प्लॅटफॉर्म तयार करावा वाटला. पुढच्या पिढीच्या उच्चशिक्षण मार्गातील अडचणी कमी व्हाव्यात आणि जागतिक कीर्तीच शिक्षण पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या, बहुजन समाजातील लेकरं कसे घेऊन शकतील हाच त्यामागची मुख्य उद्देश.
मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजुला मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाट मित्राच्या गटासोबत दोन वर्ष पूर्णवेळ काम त्याने केले. कलेक्टर होऊन भविष्यात सामाजिक बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहत असताना तो आदिवासी भागातील त्यावेळेसचे प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचे त्यांनी ठरवले आणि अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न नैसर्गिक रित्याच गळून पडले.
टाटा इन्सिट्यूटमधून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्याने ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. त्याद्वारे त्याला थेअरीचे ज्ञान प्रत्यक्षात आणायचे होते. २०१५ मध्ये त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवायचे ठरवले. आपल्या गावाचा जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर बनवला आणि तो गावकऱ्यांना दिला. पण प्रस्थापित राजकीय समाजाने त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. बरेच अडथळे होते पण त्यातूनही तो शिकत होता. राजूने महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विकास फेलोशिप मध्येही काम केलेले आहे. त्या काळात त्याने पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्याच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. ज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने आणि ग्रामीण भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३०००० हून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय उभी राहण्यासाठी वितरीत केली.

Leave a Reply