प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली, उद्या होणार अंत्यसंस्कार

कोल्हापूर : १७ जानेवारी – शेतकरी – कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक एन.डी. पाटील यांचे आज(१७ जानेवारी) कोल्हापुरात खासगी रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. उद्या (१८ जानेवारी) कोल्हापुरमधील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार) मैदानावर सकाळी ८ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. करोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही.
तसेच एन.डी.पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. करोनाच्या नियमांमुळे केवळ २० जणांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.
उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं – अजित पवार
“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड – सतेज पाटील
“शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. ” , अशा भावना राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त करून प्रा. एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सतेज पाटील म्हणाले की, “ समाजाच्या हितासाठी अखेपर्यंत सरांनी रस्त्यावर उतरून लढाई केली. कामगार-शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे, आंदोलने करत न्याय भूमिका घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन, सीमा प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर लढा उभारणारे अभ्यासू आणि वैचारिक, कणखर व्यक्तिमत्व आमच्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हे त्यांनी कृतीतून करून दाखविले. सर आज आमच्यात नाहीत ही भावना वेदनादायी आहे. आदरणीय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! ”

Leave a Reply