आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल – नारायण राणे

सिंधुदुर्ग : १७ डिसेंबर – राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाकाळात झालेले मृत्यू आणि इतर नुकसानाला ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचेही राणे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष दिसून येत आहे.
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असतानाच, ओबीसींच्या खुल्या प्रवर्गात टाकलेल्या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. तर इतर 73 टक्के जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे, आमच्याकडे सेवा आणि माध्यम आहे, त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देईल अशा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
जैतापूर प्रकल्प स्थानिकांना हवा आहे
जैतापूरला आम्ही जमिनी घ्यायला गेलो नाही, जैतापूरला महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जमीनी किती आहेत बघा. असा टोलाही राणे यांनी लगावला आहे. स्थानिकांना हा प्रकल्प हवा आहे. स्थानिक लोक मला भेटून गेले. असेही नारायण राणे म्हणाले आहेत.
कोरोनाकाळात भाजपने चांगले काम केले
कोरोनाकाळात भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना चांगली सेवा पुरवली, तर दगावलेल्या कोरोना रुग्णांना पूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे, त्यामुळे कोकणातील मतदारांनी भाजपला मतदान करावे असे आवाहन नारायण राणे यांनी केले आहे. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन कोकण काबीज करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत, तसेच मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारीही राणेंकडे दिली आहे. त्यामुळे राणेंनी निवडणुकांची तयारी जोरदार सुरू केली आहे. कोकणातही आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हे खुलं आव्हान असणार आहे.

Leave a Reply