दोन गुन्ह्याची माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात लपवल्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांना भोवणार?

नागपूर : ८ डिसेंबर – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्यावर असलेल्या दोन गुन्ह्याची माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जाहीर न करता लपवल्याचे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात साक्ष पुराव्यावर आले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढणार असेच चित्र निर्माण झाले आहे. नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदार संघातून देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये आमदारकीची निवडणूक लढले. याच निवडणुकीत ते विजयी झाल्यानंतर राज्यात भाजपचे सरकार आले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण याच निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी खटल्याची माहिती सादर केली नाही. त्यांना माहीत असताना त्यांनी ही माहिती लपवून ठेवली अशी तक्रार जे एमएफसी न्यायालयात अडव्होकेट सतीश उके यांनी केली.
याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टातुन दिलासा मिळाला. पण, सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अडव्होकेट सतिष उके यांच्या बाजूने लागला. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तक्रार बरोबर आहे, असे म्हणत या प्रकरणाची सुनावणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी घ्यावी, अशा सूचना दिल्याने पुन्हा हे प्रकरण कोर्टापुढे आले आहे.
या प्रकरणात दोषारोप ठेवून सुनावणी घेऊन दोन्ही बाजू एकूण घेतल्या जाणार असल्याने हे प्रकरण आता महत्वाच्या टप्प्यात आले आहे. लवकरच या प्रकरणात साक्ष पुरावे सादर केले जाणार आहे. जर यात निकाल देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लागल्यास ६ महिन्यापर्यंत शिक्षा किंवा दंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वतीने त्यांचे वकील हे न्यायालयापुढे हजर राहतील आशीही विनंती न्यायालयाला केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना माहिती असताना दोन फौजदारी प्रकरणाची माहिती प्रतिज्ञापत्रात नमुद न केल्याने लोकप्रतिनिधी कायद्यानुसार १२५ (अ) गुन्हा ठरतो. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत असल्याने त्याच्यावर दोषारोप ठेवण्यात आले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने त्यांचे वकील उदय डबले यांनी हे आरोप फेटाळले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सुनावणी होईल, त्यानंतर याचा काय निकाल लागले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात फौजदारी न्यायालयाच्या वतीने देवेंद्र फडणीस यांना पुढील तारीख देण्यात आली.
त्या दोन्ही खटल्यात त्यांच्या नावाने आरोप आहे. ते नागपूर महानगर पालिकेच्या असताना सण १९९८-९९ त्यानी पदाचा गैरवापर करून पराते नामक एका वकिलाच्या संपत्तीवर त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीचे नाव टॅक्समध्ये चढवून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिले होते. त्यामुळे ते नाव चढवुन घेण्यात आले. त्या प्रकरणात संपत्ती बळकावणे, फौजदारी कट रचणे, कागदांची हेरफेर करण्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर दुसरे प्रकरण हे पराते नामक वकिलांच्या विरोधात बदनामीकारक पत्र बार असोसिएशनला दिले होते. त्यात बदनामी केल्याने बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply