ज्युलिओ रिबेरो यांच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांचे लेखणीतून उत्तर

नागपूर : २७ एप्रिल – माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांचा एक लेख 24 एप्रिलला प्रसिद्ध झाला होता . त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज लेख लिहून उत्तर दिले आहे. आपली भूमिका स्पष्ट करणारा देवेंद्र फडणवीसांचा लेख आज (27 एप्रिल) प्रकाशित झाला आहे. ज्युलिओ रिबेरोंनी विविध मुद्दे मांडून फडणवीसांचे कौतुक आणि टीकाही केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर घटनाक्रम दिला व आपले स्पष्टीकरण सादर केले.

• माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीबद्दल आपण कौतूक केले, त्याबद्दल आभार, तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील.
• तुमचा स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या प्रोफेशनबाबत असलेली वचनबद्धता याचा मला नेहमीच आदर वाटत आला आहे.
• तुमचा प्रतिवाद मला करायचा नाही. कारण आपल्यात काही तात्विक मतं-मतांतरे असू शकतात. पण, प्रत्येक टीका ही मी रचनात्मक पद्धतीने घेतो. महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने जो चुकीचा प्रचार केला, त्याबाबत वस्तुस्थिती सर्वांसमोर ठेवणे, केवळ या हेतूने मी हा लेख लिहित आहे.
• मी किंवा प्रवीण दरेकर यापैकी कुणीही भाजपासाठी रेमडेसिवीर खरेदी करणार नव्हतो. यासंदर्भात एफडीए मंत्र्यांना आधीच दिलेले पत्र हे स्वयंस्पष्ट आहे की, आम्ही केवळ समन्वय घडवून आणत आहोत. एफडीएनेच ते खरेदी करायचे आहेत. यात प्रशासकीय पातळीवर काही अडचणी येणार असतील, तर ते आम्ही खरेदी करतो आणि सरकारला देतो, असाही प्रस्ताव दिला. प्रवीण दरेकर यांनी त्या उत्पादक कंपनीचा आणि एफडीए मंत्र्यांचा संवादही घडवून आणला. यानंतरच एफडीएने अधिकृत पत्र या कंपनीला दिले. त्यामुळे हा साठा महाराष्ट्र सरकारलाच मिळणार होता, हे स्पष्ट होते. शिवाय, स्वत: एफडीए मंत्र्यांनी एका मुलाखतीत हा साठा राज्य सरकारसाठी होता, हे स्पष्ट केलेले आहे.
• मी डीसीपी कार्यालयात का गेलो? तर, एका मंत्र्याच्या ओएसडीने या पुरवठादाराला फोन केला होता. विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर का देता? तुम्ही केवळ सरकारच्या सांगण्यावरून दिले पाहिजे. त्यावर पुरवठादाराने सांगितले की, मी हा साठा केवळ सरकारलाच देणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी एक एपीआय सिव्हील ड्रेसमध्ये त्याला ट्रॅप करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी रेमडेसिवीर मागितले. पण, सदर कंपनीने त्याला ते देण्यास ठाम नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर रात्री 8 ते 10 पोलीस त्यांच्या घरी गेले आणि त्यांचा फोन तपासला व त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. याबाबत दरेकरांनी मला माहिती दिली की यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे.
• मी जॉईंट सीपी यांच्याशी दोन ते तीन वेळा बोललो. त्यांना संपूर्ण प्रकरण, एफडीएची परवानगी आणि धमक्यांचे कॉल याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मी मुंबई पोलीस आयुक्तांना लँडलाईन, मोबाईल आणि एसएमएस अशा तिन्ही पद्धतीने संपर्क केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माजी गृहमंत्री म्हणून मला अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अंदाज आला होता की, ही कारवाई राजकीय हेतूने होते आहे. महाराष्ट्राला ज्या औषधाची गरज तर, ते देणाऱ्या व्यक्तीचा असा छळ होऊ नये, यासाठी धावपळ करणे ही माझी नैतिक जबाबदारी होती.
• जाहीर न करता मी तेथे गेलो असे नाही. हा संपूर्ण प्रकार मी सीपींना एसएमएसने कळवला होता. तुमच्याकडून प्रतिसाद नाही, म्हणून मी डीसीपी कार्यालयात जातोय, हेही कळवले होते. जॉईंट सीपी, अ‍ॅडिशनल सीपी, डीसीपी यांनाही कळवले. डीसीपी कार्यालयात पोहोचल्यावर त्यांनी मान्य केले, की एफडीएच्या आदेशाची प्रत आम्हाला माहिती नव्हती. तेथे गेल्यावर मी हा सुद्धा प्रश्न विचारला, की या कंपनीने साठेबाजी केली आहे का? केली असेल तर तत्काळ कारवाई करा.
• 10 मिनिटात जॉईंट सीपी आणि अ‍ॅडिशनल सीपी तेथे पोहोचले. आमच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सीपींशी खासगीत चर्चा केली आणि नंतर त्या कंपनीच्या व्यक्तीला आवश्यकता पडल्यास पुन्हा बोलावू असे सांगून सोडून दिले.
• माजी मुख्यमंत्र्यांनी पोलीस ठाण्यात जावे की नाही, यासंदर्भात मला सांगायचे आहे की, मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. सरकार ज्याला कॉल करीत नाही आणि आमच्या एका कॉलवर जो राज्याला मदत करतो आहे, त्याचा छळ होऊ नये, हा एकमेव हेतू होता. गृहमंत्री म्हणून मी कायम प्रोफेशनल इंटिग्रिटी पाळली आहे. म्हणून माझ्या हातून कधी चूक झालीच तर एखाद्या पोलीस कॉन्स्टेबलची माफी मागण्यास सुद्धा मी मागेपुढे पाहणार नाही. कारण, मी नेहमीच माझ्या कामाशी प्रामाणिक राहिलो आहे. तरीसुद्धा तुमच्या मतांचा मला आदर आहे आणि तसा बदल घडवून आणण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन.
• विरोधी पक्ष हा काही केवळ बोट दाखवण्यासाठी नसतो. पण, अशा स्थितीत तो आपले संपर्क वापरून राज्याला मदत करणारा सुद्धा असला पाहिजे, हा विचार करूनच आम्ही हा मदतीचा प्रयत्न केला. या कंपनीला परवानगी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आणि अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्रालाच मिळाव्यात, अशी अट घातली. पण, यात इतके भयंकर राजकारण होईल, याची कल्पना सुद्धा आम्ही केली नव्हती. महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह गँगने जेव्हा त्याचे खोटे व्हिडिओ तयार केले, तेव्हा गलिच्छ राजकारणाने आणखी हीन पातळी गाठली होती. अर्थात हे विषय स्वतंत्रपणे कायदेशीरदृष्ट्या आपण हाताळणार आहोतच, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

Leave a Reply