तर भाजपने देशभरात दंगल घडवून आणल्या असत्या – भास्कर जाधव यांची जळजळीत टीका

गुहागर : ३ डिसेंबर – ‘1947 रोजी देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती’ असं वक्तव्य करणाऱ्या कंगना रनौत हिचा पुरस्कार सरकारने खरं तर परत घ्यायला हवा होता. पण आजपर्यंत भाजपकडून तिच्या वक्तव्याचा साधा निषेधही नोंदवला गेला नाही ही बाब शरमेची आहे. हेच वक्तव्य इतर धर्माकडून झालं असतं, विशेषतः मुस्लिम धर्माकडून झालं असतं तर भाजपने देशभरात दंगल घडवून आणल्या असत्या, जाळपोळी केल्या असत्या, विरोध करणाऱ्यांना देशद्रोही म्हणलं असतं’ अशी जळजळीत टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर केली.
गुहागरमधील जिल्हा परिषदेचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
‘स्वतःला सावरकरवादी म्हणवणाऱ्या भाजपने किमान सावरकरांबद्दल तरी आस्था बाळगायला हवी होती, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःच्या संसारवर तुळशीपात्र ठेवत हसत हसत फासावर जात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, असे म्हणत त्याचा अवमान करणाऱ्या कंगना रनौतवर कोणतीही कारवाई झाली नाही. याचा अर्थ कंगना रनौतला हे सगळं बोलण्या करता तर पुरस्कार दिला गेला नाही ना? अशी शंका भास्कर जाधवांनी बोलून दाखवली.
‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन 80 तासांचं सरकार बनवून सर्वात आधी पाठीत खंजीर भाजपने खुपसला होता. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे,कुणी धोका दिला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची तयारीही शिवसेनेची आहे, असं जाधव यांनी ठणकावून सांगितलं.
डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत राज्य सरकारने घट करावी या भाजपच्या मागणीवर यावेळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यावर जोरदार हल्ला केला. ‘केंद्राने जी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये घट केलीय ती जनतेची कीव आली म्हणून नाही तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असल्याचंही ते म्हणाले.
‘राज्याचे GST चे 35 हजार कोटी केंद्राने दिले नाहीत याबद्दल कधी भाजपच्या नेत्यांनी केंद्रात कधी विचारलं का ? राज्यात तौक्ते वादळ आलं त्यावेळी भाजपच्या मंडळींनी फक्त आरोप केले. मदत काहीच नाही. निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी फक्त टीका केली. मदत काहीच नाही. महापूर आला तेव्हाही या लोकांनी फक्त टीका केली. याचा अर्थ फक्त टीका करायची एवढंच काम भाजपकडे आहे, मदत मात्र काही करायची नाही असा उद्योग या लोकांचा आहे, असं म्हणत जाधव यांनी भाजपचा समाचार घेतला.

Leave a Reply