भाजपचे मुंबई प्रेम बेगडी – संजय राऊत यांचा घणाघात

मुंबई : २ डिसेंबर – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आणि राज्यातले सत्ताधारी पक्ष त्यांना मदत करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्या आरोपाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे मुंबई प्रेम बेगडी असल्याचा घणाघात त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यावरून भाजप आणि शिवसेनेत जुंपली असल्याचे बघायला मिळते. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. ममता बॅनर्जी या महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये पळवून नेण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका व्यक्त करतानाच, राज्यातील सत्ताधारी पक्ष त्यांना मदत करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट केले आहे. भाजपचे मुंबई प्रेम हे बेगडी असल्याचे राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या तर पोटशूळ उठला, म्हणे मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आल्या आहेत, असे राऊत म्हणाले.
यावेळी राऊत यांनी ट्वीटमध्ये ‘व्हायब्रंट गुजरात’चा उल्लेख करतानाच भाजपवर नेम साधला. व्हायब्रंट गुजरातसाठी आज गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होत आहे, असं सांगतानाच, ‘आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून’, असं राऊत म्हणाले. राऊत यांनी भाजपकडून टीका करणाऱ्या नेत्यांवरही तोफ डागली. मुंबईतून आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर गुजरातला पळवून नेले, तेव्हा भाजपचे बोलभिडू शेपूट घालून का बसले, असा सवाल त्यांनी केला. योगी आदित्यनाथ हे मुंबईतील सिनेउद्योग उत्तर प्रदेशात नेण्यासाठी शर्थ करत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःकडे पाहा, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply