भाजपविरोधात एकत्रपणे लढण्यावर तृणमूल आणि शिवसेनेचे एकमत – संजय राऊत

मुंबई : १ डिसेंबर – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर शिवसेना नेत्यांची ममत बॅनर्जी यांनी भेट घेतली. या भेटीत काय राजकीय चर्चा झाली, याविषयी प्रश्न विचारले जात आहे. खासदार संजय राऊत यांनी या भेटीविषयी पत्रकारांच्या प्रश्नांना आज उत्तरे दिली.
सर्वप्रथम ममता बॅनर्जी यांची शिवसेनेच्या नेत्यांची भेट ही निश्चितच राजकीय हेतूने होती, हे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून भविष्यातील रणनीतीदेखील विचारात घेतली गेली, अशी माहिती राऊत यांनी दिली.
संजय राऊत म्हणाले, ”महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते सीबीआय, एनसीबी, ईडी अशा सरकारी तपास यंत्रणांमार्फत दहशतवाद निर्माण करत आहेत. अशाच प्रकारचं ‘महान’ कार्य भाजप पश्चिम बंगालमध्येही करत आहे, अशी माहिती ममता दीदींनी दिली. मात्र तेथे आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रदेखील या दहशतवाद्यांशी सामना करेल, अशी खात्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
२०२४ मधील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती रणनिती आखायची यावरही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून भाजपविरोधात एकत्रपणे लढण्यावर यावेळी एकमत झाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अन्यायाशी, असत्याविरोधात एकत्र लढू, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर त्यांना सध्या तरी भेटता येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आल्याने ममता बॅनर्जी यांची शिवसेनाप्रमुखांशी भेट होऊ शकली नाही. मात्र सिद्धीविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उद्धवजींची प्रकृती लवकर ठिक व्हावी, यासाठी प्रार्थना केली, अशी माहिती राऊत यांनी दिली.
ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजच्या भेटीकडेही अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. ही भेट देखील निश्चितच महत्त्वाची असेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. कारण शरद पवार यांच्याएवढी राजकीय उंची असलेल्या त्या सध्या एकमेव नेत्या आहेत, त्यांचा राजकीय अनुभवदेखील प्रगल्भ आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील चर्चा देशाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, असे राऊत म्हणाले.

Leave a Reply