काहीही चमत्कार होणार नाही, नागपुरात भाजपचाच विजय – देवेंद्र फडणवीस

दिल्ली : २६ नोव्हेंबर – राज्यातील मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमधील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यात भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना यश आलं आहे. मात्र, कोल्हापूर आणि अकोल्यात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. नागपुरात भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेस उमेदवार छोटू भोयर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भोयर विजयी होतील असा दावा केलाय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आशा फोल ठरतील. विजय बावनकुळेंचाच होईल, असा विश्वास व्यक्त केलाय.
देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसला अपेक्षा आहे की ते चमत्कार घडवतील. पण काहीही चमत्कार होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे चांगल्या फरकानं विजयी होतील, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
भाजपकडून नागपूरची जागाही बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी अडेलतट्टू भूमिका घेतल्यामुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही, असं धनंजय महाडिक माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, नागपूरसाठी भाजपकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आला नाही. या निवडणुकीत कुणाकडे किती नंबर याला काही महत्व नसतं. काँग्रेस उमेदवार छोटू भोयर विजयी होतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध छोटू भोयर अशी तगडी फाईट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पाटील आणि फडणवीस दोघेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसंच या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. संघटनेच्या पुढील वाटचालीवर बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा झाली. चार पाच तास त्याच बैठकीत होतो. बाकी कुठलाही अजेंडा नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांनी केलेल्या महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या दाव्याबाबत विचारलं असता मी ते ऐकलं नाही, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply